गडचिरोली समाचार : मौजा- विश्रामपूर मेंढा, ता. जि. गडचिरोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दिनांक ७ जानेवारी २०२५ ते १३ जानेवारी २०२५ या कालावधीत गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत “राष्ट्रीय सेवा योजना शिबीर” संपन्न झाले. एकता सामाजिक शिक्षण संस्था गडचिरोलीच्या वतीने संचालित इंदिरा गांधी महाविद्यालय, गडचिरोलीतर्फे आयोजित या शिबिराचा मुख्य विषय होता, “नशामुक्त युवा – अहिंसा युक्त युवा : ग्राम विकास ते राष्ट्र विकास”.
या शिबिराचे उद्घाटन भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार माननीय अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलनाने झाले. उद्घाटन प्रसंगी बोलताना त्यांनी ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची गरज व्यक्त केली. त्यांनी युवकांना नशामुक्त जीवन जगण्याचे महत्त्व समजावताना सांगितले की, शिक्षण हीच प्रगतीची गुरुकिल्ली आहे. आजचा युवक हा उद्याचा राष्ट्रनिर्माते असून त्यांचे शैक्षणिक आणि सामाजिक जीवन नशामुक्त असावे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
सामाजिक प्रबोधनातून सकारात्मक संदेश
या शिबिरात विद्यार्थ्यांनी एक प्रभावी नाटिका सादर केली, जी सामाजिक प्रबोधनासाठी प्रेरणादायी ठरली. मोबाईलचा दुष्परिणाम आणि त्याचा लहान मुलांवर होणारा नकारात्मक प्रभाव याचे सुंदर चित्रीकरण करण्यात आले. या नाटिकेने उपस्थितांमध्ये जागृती निर्माण केली. नाटकाचे कौतुक करताना उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
या शिबिराच्या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख मान्यवरांमध्ये अध्यक्षस्थानी विश्व शांतिदूत तथा सामाजिक नेते प्रकाशजी अर्जुनवार, उद्योगपती रमेशजी सारडा, सरपंच वैशाली चचाने, डॉ. कोरेवार (वैद्यकीय अधिकारी), कुणाल निंबोडकर, संजयजी बारापात्रे, जीवन दाणे, प्रमोद साखरे, अशोक अंबादे, मधुकर भोयर हे मान्यवर उपस्थित होते. गावातील नागरिक, युवक, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनीही या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजेरी लावली.
या शिबिराने युवकांना सामाजिक जाणिवा विकसित करण्यासाठी प्रेरित केले. नशामुक्त जीवन आणि अहिंसेच्या मार्गाने ग्रामविकास साधत राष्ट्रीय प्रगतीकडे वाटचाल करण्याचा संदेश यशस्वीरित्या दिला.
“शाश्वत विकासासाठी युवकांची जबाबदारी” या विचारावर आधारित हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.