जिल्हयाधिकाऱ्यांनी घेतला रोवणीचा प्रत्यक्ष अनुभव
नागपूर बाजार पत्रिका : जिल्ह्यामध्ये भाताची रोवणी करताना श्री पद्धतीचा अवलंब करण्या’त यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
जिल्ह्यामध्ये जवळपास ८६ हजार हेक्टरवर भाताची लागवड होणार आहे. भाताची रोवणी व त्याआधी शेताची मशागत याचा प्रत्यक्ष अनुभव आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी घेतला. तंत्रज्ञानातील बदल समजून घेऊन त्यांनी जिल्ह्यामध्ये श्री पद्धतीचा अवलंब करण्याच्या आवाहन शेतकऱ्यांना केले आहे.
जिल्ह्यातील पारशिवणी तालुक्यातील कान्हादेवी येथे श्री. राम दशरथजी लांजेवार यांच्या शेतावर बेडवर श्री पद्धतीने भात लागवड करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसोबत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविंद्र मनोहरे, तालुका कृषी अधिकारी पारशिवनी सूरज शेंडे, गावचे सरपंच सौ. छायाताई मधुकर नेवारे, पोलीस पाटील प्रेमलताताई भोयर, प्रगतिशील शेतकरी श्रावण इडपाची, सूर्यभान राऊत लक्ष्मण लांजेवार, हेमराज भुतांगे, कृषि पर्यवेक्षक,पी.सी. झेलगोंदे, जे बी भालेराव, कृषि सहाय्यक आर डी सोरमारे उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्वतः धान बांधीत उतरुन रोप लावणी केली. तसेच श्री. लांजेवार यांच्याकडील जतन करून ठेवलेले राळा,नाचणी,खपली, गहू यांबद्दल माहिती घेतली.तसेच कुक्कुटपालन,दुग्ध व्यवसाय फळबाग लागवडीची पाहणी केली व मार्गदर्शन केले.
ट्रॅक्टर चालवून चिखलणीकरण केले
भाताची रोवणी करण्यापूर्वी शेताची विशिष्ट पद्धतीने मशागत करणे आवश्यक असते. याला चिखलणीकरण म्हणतात. पूर्वी बैलांच्या मदतीने हे चिखलणीकरण करण्यात येत होते.आता ट्रॅक्टरच्या मदतीने करण्यात येते. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवून चिखलणीकरण करण्याच्या प्रक्रियेत स्वतः सहभाग घेतला.