नागपूर समाचार : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकार परिषदेत मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील 100 दिवसांच्या कामगिरीवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकसित भारताचा संकल्प करत 122 विकासाच्या मुद्द्यांवर निर्णय घेतले आहेत.
प्रमुख मुद्दे
1. 100 दिवसांत 3 लाख कोटींची कामे सुरू – लोकसभा निवडणुकीतील महत्त्वाचे मुद्दे सांगताना बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, 100 दिवसांत 3 लाख कोटी रुपयांच्या कामांची सुरुवात झाली आहे.
2. एमएसपी वाढ आणि शेतकऱ्यांना लाभ – किमान आधारभूत किंमती (MSP) वाढवून शेतकऱ्यांना फायदा झाला असून, इम्पोर्ट ड्युटी नसल्यामुळे उत्पादनांना चांगला भाव मिळाला आहे. विशेषत: बासमती तांदूळ आणि कांदा उत्पादकांना याचा मोठा लाभ होईल.
3. मध्यमवर्गीय आणि महिलांसाठी योजना – मध्यमवर्गीयांसाठी कर सवलती आणि रोजगार निर्मितीवर भर दिला गेला आहे. “माझी लाडकी बहीण” योजनेसह इतर योजनांमधून महिलांना रोजगार मिळत आहे.
4. आदिवासी आणि अनुसूचित जमातीसाठी विकासकार्य – उन्नत भारत अभियानातून अनुसूचित जमातीच्या 63 हजार गावांचा विकास करण्यात आला आहे. प्रत्येकी 5 कोटी रुपये देण्यात आले आहेत.
5. वयोवृद्धांसाठी आरोग्य सेवा – 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंत सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध केली आहे, ज्याचा फायदा साडेचार कोटी नागरिकांना होणार आहे.
6. शेतकऱ्यांसाठी सौर ऊर्जा आणि मोफत वीज – प्रधानमंत्री सौर ऊर्जा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सोलर पंप 25 हजार रुपयांत मिळणार आहेत. तसेच, शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज मिळण्याची सोय करण्यात आली आहे.
7. सायबर गुन्ह्यांवर काम – सायबर गुन्ह्यांशी लढण्यासाठी विशेष पावले उचलली जात आहेत.
लोकसभा निवडणुकीनंतरची रणनिती
भाजप प्रदेशाध्यक्षांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारने देशासाठी केलेल्या योगदानाची मांडणी आम्ही केली होती. विरोधकांनी जनतेला कन्फ्युज केले, मात्र 100 दिवसांतल्या कामगिरीचा हिशेब जनता लवकरच पाहू शकेल. केंद्रातील भाजप सरकार 2029 पर्यंत सत्तेत राहील आणि महाराष्ट्रात डबल इंजिन सरकार आणण्यावर भर असेल.
राहुल गांधी आणि आरक्षणावर टीका
बावनकुळे यांनी राहुल गांधींवर टीका करत म्हटले की, राहुल गांधींनी आरक्षणासंदर्भात केलेली वक्तव्ये बुद्धिहीन आहेत. आम्ही त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात आरक्षणासंबंधी प्रश्न विचारू.
रामदास आठवले यांच्यावरील वक्तव्य: राहुल गांधींनी भारताची बदनामी केली, असे आठवले यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्रीपदावर भाष्य: शरद पवार सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री बनवू इच्छितात, तर नाना पटोलेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या इच्छेबद्दल त्यांनी भाष्य केले.